क्रिकेटचे माहेरघर अर्थात इंग्लंमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामी सामन्यामध्ये भारतीय संघाने आज उत्कृष्ठ कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा साऊथ आफ्रिकन कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस याचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करीत साफ निष्फळ ठरविला. भारतातर्फे जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांनी भेदक मारा करीत दक्षिण आफ्रिकी फलंदाजांना अक्षरशः गुढगे टेकवण्यास भाग पाडले. आफ्रिकेचे सलामीवीर हाशिम आमला (6) आणि क्विंटन डी काँक (10) यांना जसप्रीत बुमराहाने माघारी धाडले तर फाफ डु प्लेसी (38), रैसी वैन डर डुसेन (22) आणि डेविड मिलर (31) यांना फिरकीपटू युजवेंद्र चहल याने तंबूचा रस्ता दाखविला. भारताच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ कसाबसा 227 पर्यंत धावांपर्यंत मजल मारू शकला.
दक्षिण आफ्रिकेच्या तुटपुंज्या लक्ष्याचा सामना करताना भारताने सलामीवीर रोहित शर्मा याने ठोकलेल्या शतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने समोर ठेवलेले २२७ धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारतातर्फे रोहित शर्माने सर्वाधिक १२२, महेंद्र सिंह धोनीने ३४ तर केएल राहुलने २६ धावा ठोकल्या. हिटमॅन रोहित शर्मा आणि अनुभवी महेंद्र सिंह धोनी यांनी पाचव्या विकेटससाठी संयमी विजयी भागीदारी करत विजय भारताच्या पारड्यात पाडला. भारताने विश्वचषकातील पहिलाच सामना ६ गडी आणि १५ चेंडू राखून जिंकला आहे.