हॅमिल्टन – महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा 8 विकेट्स राखून पराभव केला व स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. मात्र, सलग चार पराभव झाल्यामुळे पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरीही त्यांच्या विजयामुळे भारताच्या महिला संघाला लाभ होणार असून, उपांत्य फेरीत स्थान मिळण्याची संधीही वाढली आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 20 षटकांचा खेळवण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडीज महिला संघाला 20 षटकांत 7 बाद 89 धावाच करता आल्या. फिरकी गोलंदाज निदा दरने 4 विकेट्स घेत वर्चस्व राखले.
पाकिस्तान महिला संघाने केवळ 2 विकेट्स गमावून 90 धावा करत विजय प्राप्त केला. पाकिस्तानकडून मुनीबा अली हिने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. कर्णधार बिस्माह मारुफने 20 आणि ओमैमा सोहेलने 22 धावांची नाबाद खेळी केली.