दुबई – भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींना करोनाची बाधा झाल्यामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागला होता. आता या सामन्याच्या फेरआयोजनाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी सूचना आयसीसीने इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाला (ईसीबी) केली आहे.
भारतीय खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. भारतीय संघाच्या या निर्णयामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या कसोटी सामन्याच्या फेरआयोजनाची निर्णयप्रक्रिया सुरू करण्याची मागणी आयसीसीने केली आहे.
हा कसोटी सामना शुक्रवारपासून (10 सप्टेंबर) खेळला जाणार होता. मात्र, या कसोटीच्या आदल्या दिवशी भारतीय संघाचे सहायक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आली. त्याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनाही करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे करोनाचा धोका होऊ शकतो ही भीती खेळाडूंना होती म्हणूनच भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला.
चार सामन्यांनंतर या मालिकेत भारताकडे 2-1 अशी आघाडी होती. पुढील वर्षी भारतीय संघ पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, त्यावेळी एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी ईसीबी आणि बीसीसीआय प्रयत्नशील आहेत. अर्थात याबाबत सध्या दोन निकालांचे पर्याय समोर आले आहेत. आयसीसीच्या वाद निवारण समितीला (डीआरसी) हा कसोटी सामना आयसीसीच्या करोनाबाबतच्या नियमांनुसार रद्द झाल्याचे आढळल्यास ही मालिका चार सामन्यांची मानली जाईल. भारताकडे 2-1 अशी आघाडी असल्याने त्यांना विजेते घोषित करण्यात येईल.
भारताने हा सामना बहाल केल्याचा डीआरसी विचार करेल. त्यामुळे पाचव्या कसोटीचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागेल आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल. आयसीसीचा अंतिम निर्णय हा डीआरसीच्या शिफारसीनुसार घेतला जाणे अपेक्षित आहे.