मेलबर्न – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतरही भारतीय संघाला आयसीसीच्या नियमाचा फटका बसला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेत सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघाला दुसरे स्थान मिळाले आहे.
आतापर्यंत झालेल्या सामन्यांत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात 390 गूण असून ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 322 गुण आहेत. गुणांमध्ये एवढी तफावत असूनही ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
आयसीसीने काही दिवसांपूर्वी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणांकन पद्धतीत बदल केला. स्पर्धेत सहभागी संघाची गुणतालिकेतील क्रमवारी आता त्यांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीवरुन ठरवली जाणार आहे. सहभागी संघाने आतापर्यंत खेळलेले सामने व त्यातून मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवरुन अंतिम सामन्यात कोणता संघ खेळेल याचा निर्णय घेतला जाणार आहे.
भारतीय संघाची कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतली ही पाचवी मालिका आहे. आतापर्यंत भारतीय संघाने 540 पैकी 390 गुणांची कमाई केली आहे त्यामुळे भारतीय संघाने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी ही 72.2 एवढी येते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाची ही चौथी मालिका आहे. त्यांनी आतापर्यंत 420 पैकी 322 गुण मिळवले असल्यामुळे त्यांच्या गुणांची टक्केवारी ही 76.6 एवढी आहे. याच कारणामुळे जास्त गुण मिळवूनही भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.