51 चेंडूत केली होती 82 धावांची वादळी खेळी
दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 51 चेंडूत केलेल्या 82 धावांच्या वादळी खेळीला उजाळा देत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोहलीच्या चाहत्यांनी याबद्दल आयसीसीचे आभार मानले आहेत.
आयसीसीने कोणतेही सामने सुरु नाहीत म्हणुन चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे ठरविले असून येत्या काळातही क्रिकेटपटूंच्या गाजलेल्या कामगिरीला उजाळा देणार असल्याचे जाहीर केले आहे. 2016 साली झालेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराटने केलेली तुफानी खेळी देखील अशीच गाजली होती. विराटच्या याच खेळीचा एक फोटो व व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहालीतील मैदानावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 160 धावा केल्या होत्या. भारताची फलंदाजी सुरु झाल्यावर शिखर धवन व रोहित शर्मा लवकर बाद झाले व भारतीय संघ 3 बाद 49 असा संकटात सापडला होता. त्यावेळी संघाचा डाव सावरताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करताना विराटने युवराजसिंगसह 4 थ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण भागिदारी करत विजय दृष्टिपथात आणला.
एक क्षण भारताला केवळ 6 षटकांत 66 धावांची आवश्यकता होती. विराटला साथ देण्यासाठी बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर होता. या जोडीने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले. अखेरच्या 3 षटकात भारताला विजयासाठी 39 धावांची गरज होती. जेम्स फॉकनरने टाकलेल्या 18 व्या षटकात विराटने 19 धावा वसूल केल्या. मग उर्वरीत 2 षटकात 20 धावांची गरज होती, त्यावेळी विराटने आपला दबदबा सिद्ध करत या धावा काढल्या व संघाचा विजय साकार केला. त्याने 51 चेंडूत 82 धावांची वादळी खेळी करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.
करोना विषाणूंच्या धोक्याने जगभरातील क्रिकेटसह क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत तर, इंडियन प्रीमिअर लीगसह अन्य काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. क्रिकेटचे चाहते आपल्यापासून दूर जाऊ नयेत यासाठी आयसीसीने अशाच काही सामन्यांना पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे धोरण अवलंबिले आहे.