पुणे – जिल्हा परिषदेतील माझा पहिला दिवस, पहिल्याच सर्वसाधारण सभेत होणाऱ्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी थेट माझे नाव सुचविले होते, असे असतानाही आज जिल्हा परिषदेत जो गोंधळ झाला. त्यामुळे मनस्ताप झाला. मला जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न मांडायचे आहे. कामकाज कसे चालते हे समजून घ्यायचे होते. मला सभागृहाचे काम थांबवायचे नव्हते. मी माघार घ्यायलाही तयार होते. परंतू माझे म्हणणेही कुणी ऐकून घेतले नाही. या राजकीय खेळीमुळे मी नाराज झाल्याची भावना सदस्या अंकिता पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
माझ्या आजीच्या निधनानंतर मी पोटनिवडणुकीत निवडणूक आले. या निवडणुकीला भावनिक आधार होता. स्थायी समितीत माझी निवड व्हावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माझ्या नावाचे शिफारस पत्र जिल्हाध्यक्षांना पाठविले होते. असे असतांनाही ऐनवेळी सभागृहात गोंधळ उडाला हे अपेक्षित नव्हते. मी चांगले काम करण्याच्या हेतूने आज आले होते.
स्थायी समितीच्या माध्यमातून माझ्या गटातील प्रश्नही मला सोडवायचे होते. दरम्यान, साहेबांनी अधिकृत स्टेटमेंट दिले नसतानाही त्यांच्या पक्षांतराच्या अफवा पसरविल्या जात आहेत. माझी कुठलीही चूक नसताना राजकारणात भरडल्या गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महिला सदस्यांनी माझ्या नावाला पाठिंबा दर्शविला होता. तसे पत्रही त्या देण्यास तयार होत्या. मात्र, सभागृहातील गोंधळ पाहून मी माघार घ्यायला तयार होते. सभागृहात सदस्यांच्या तुलनेत लहान असल्याची जाणीव ठेऊन मी माघार घेणार होती. मात्र, माझी माघारही घेण्यात ते तयार नव्हते.