नवी दिल्ली : आगामी २०२४ साली देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आत्तापासूनच राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच केंद्रात स्थापन होणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आता दक्षिणेतील ज्येष्ठ साहित्यिक, ‘पर्व’, ‘उत्तरकांड’ या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक एस. एल. भैरप्पा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “आपल्याला मोदींमुळेच पद्म पुरस्कार मिळाल्याचं भैरप्पा म्हणाले आहेत. तसेच, २०२४ च्या निवडणुकांविषयीही त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
दक्षिणेतील ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा यांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भैरप्पा सध्या मैसूरमध्ये वास्तव्यास असून स्थानिक प्रशासनाने त्यांना ही माहिती देऊन त्यांचे अभिनंदनही केले आहे. यानंतर एस. एल. भैरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले तसेच त्यांच्यामुळेच हा पद्म पुरस्कार मिळाला असल्याचे नमूद केले आहे.
“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. नाहीतर मला हा पुरस्कार मिळाला नसता”, असे भैरप्पा म्हणाले आहेत. “आजपर्यंत भारताला लाभलेल्या सरकारांपैकी मोदी सरकार हे सर्वोत्कृष्ट आहे. २०२९ पर्यंत मोदींना बहुमत मिळायला हवं. त्यानंतर मोदींनी तयार केलेल्या नेत्यानेच देशाचं नेतृत्व करायला हवं”, असे भैरप्पा म्हणाले आहेत. “मी हा पुरस्कार मला दिल्यामुळे मोदी सरकारचं कौतुक करत नाहीये”, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भैरप्पा यांना बीबीसीच्या माहितीपटाविषयी बोलताना याचा त्यांनी या डॉक्युमेंटरीचा निषेध केला. “भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर हे केलं जात आहे. पण भारतानं ही डॉक्युमेंटरी बॅन करायला नको होती. त्याऐवजी भारतानं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेऊन प्रतिक्रिया द्यायला हवी होती. मोदींना विरोध करणारे गोध्रामधील हत्याकांडावर मात्र मूग गिळून गप्प आहेत”, असेही भैरप्पा म्हणाले.