कवठे – कोयना-सोळशी-कांदाटी खोऱ्यात दळण-वळणासह पायाभूत सुविधा नाहीत. या सुविधा असत्या तर पर्यटन आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन या भागाचा विकास झाला असता. मात्र, दुर्दैवाने विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात विकासाच्या केवळ वल्गना करण्यापलिकडे काहीही केले नाही. भौगोलिकदृष्ट्या मतदार संघाच्या अनेक समस्या आहेत. सर्वांनी एकत्रितपणे बसून प्राधान्यक्रमाने या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
भविष्यात त्याचा आराखडा तयार करून पर्यटन वृद्धीसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून जाणिवपुर्वक प्रयत्न केले जातील. त्यासाठी या विधानसभा निवडणुकीत उरलेल्या पाच दिवसात या खोऱ्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांसह जनतेने रात्रंदिवस प्रयत्न करून लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि वाई विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून मला प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे. पुढील पाच वर्षात विकास काय असतो, हे दाखवून देण्याची जबाबदारी माझी आहे, असा विश्वास मदन भोसले यांनी दिला.
गोगवे (ता. महाबळेश्वर) येथे कोयना-सोळशी-कांदाटी खोऱ्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमित कदम, भाजपचे सरचिटणीस अनुप सुर्यवंशी, महाबळेश्वर अर्बन बॅंकेचे चेअरमन आणि शिवसेनेचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष राजेश कुंभारदरे, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव भिलारे, शिवसेना महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा लिलाताई शिंदे, महाबळेश्वरच्या तालुका महिला आघाडीच्या भाजप अध्यक्षा उषाताई ओंबळे, मधुसागरचे संचालक सुरेश शिंदे, कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मदनदादा भोसले म्हणाले, राजकारणात मला अनेकवेळा यश-अपयश आले आहे. परंतु यशाने कधी हुरळुन गेलो नाही की अपयशाने खचुन गेलो नाही. लोकांनी कारखान्याचे सोपविलेले काम उत्तमप्रकारे केलेले आहे. कारखान्याचा नावलौकिक झालेला आहे.
एकाचे तीन कारखाने झालेले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांबद्दल काही बोलत नाहीत. त्यांच्याकडून उठावदार असे कोणतेही काम झालेले नसल्याने ते बोलणार तरी काय? त्यामुळे किसन वीर कारखान्याचे वाटोळे केल्याच्या वल्गना करून जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग सध्या त्यांनी सुरु केला आहे.दरम्यान, सध्या महायुतीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले असून विरोधकांच्या क्षणिक अमिषाला बळी न पडता हे चांगले वातावरण शेवटपर्यंत टिकून ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी गजानन बाबर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, अमित कदम यांनीही आपल्या भाषणात विद्यमान आमदारांवर विकासकामांच्या मुद्द्यांवरुन सडकून टीका केली. तसेच विजयराव भिलारे, राजेश कुंभारदरे, किसनराव भिलारे, किसनशेठ शिंदे, गणेश उत्तेकर, अशोक शिंदे, लिलाताई शिंदे यांनीही आपल्या मनोगतात विद्यमान आमदारांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करून मदनदादा भोसले यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
मेळाव्याला पंचायत समितीचे माजी सभापती बापू जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सपकाळ, धोंडीराम जाधव-पाटील, शिवसेना पुर्व तालुका प्रमुख संतोष जाधव, शिवसेना पश्चिम तालुका प्रमुख संजय शेलार, नंदुशेठ बावळेकर, आशाताई भिलारे, शैलेश जाधव, सुनिल जाधव, विठ्ठलशेठ शिंदे, कोयना-सोळशी-कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.