कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपची जोरदार या दोन्ही पक्षांची सत्ता मिळवण्यासाठी तयारी सुरु आहे. एकीकडे भाजपने निवडणुकीची आक्रमक तयारी केली असतानाच, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दावा केला आहे की, “पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल.” म्हणजेच भाजपला तिहेरी आकडा गाठता येणार नाही, असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे सहयोगी म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “मीडियातील काही चॅनल्सनी भाजपचा गरजेपेक्षा जास्तच प्रचार केला आहे. पण सत्य हे आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा (99) पार करण्यासाठीच संघर्ष करावा लागेल. प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्याने आपलं ट्वीट सेव्ह करण्याचं आवाहन करत म्हटलं की “जर भाजपची कामगिरी यापेक्षा चांगली झाली तर ट्विटर सोडेन.”
For all the hype AMPLIFIED by a section of supportive media, in reality BJP will struggle to CROSS DOUBLE DIGITS in #WestBengal
PS: Please save this tweet and if BJP does any better I must quit this space!
— Prashant Kishor (@PrashantKishor) December 21, 2020
प्रशांत किशोर यांचे हे ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यानंतर आले आहे. बंगाल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते की, “विधानसभा निवडणुकीपर्यंत ममता बॅनर्जी एकट्या राहतील.”
दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या ट्वीटवर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, “पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी आली आहे. सरकार बनल्यानंतर या देशाला एक निवडणूक रणनीतीकार गमवावे लागेल.