लोणी काळभोर परिसरात पाहणी, उपाययोजनांवर चर्चा
लोणी काळभोर – पुणे-सोलापूर महामार्गावरील 15 नंबर ते उरुळी कांचनदरम्यान अपघातरहित वाहतुकीसंदर्भात पोलीस खात्यासहित सर्व संबंधित शासकीय विभागांना कडक सूचना दिल्या आहेत. यानंतरही वाहतूक सुरळीत न झाल्यास संबंधित शासकीय खात्यांविरोधातील जनतेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः करील, असा खणखणीत इशारा शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
लोणी काळभोर परिसरात सोलापूर महामार्गावर दोन शाळकरी सख्ख्या बहिणी व एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. यासंदर्भात महामार्गाची पाहणी करण्यासाठी डॉ. कोल्हे हे आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक अभिजीत आवटे, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, पदाधिकारी उपस्थित होते. अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केल्यानंतर उरुळी कांचन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी परिषदेला महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले की, 15 नंबर ते उरुळीदरम्यान महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी पुणे शहर पोलिसांचा वाहतूक विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित सर्व शासकीय विभागांना सूचना दिल्या आहेत. अपघात कमी करण्याबाबत उपाययोजनासाठी यंत्रणा काम करत आहेत. रम्बलर स्ट्रीप, स्पीड ब्रेकर आदी उपाय करण्यात येणार आहेत. हे उपाय करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींचे मत विचारात घेणार आहे.
हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी हडपसरसाठी स्वतंत्र महानगर पालिका तयार करावी, असा प्रस्ताव दिला आहे. आमदार अशोक पवार यांनी उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्तीमध्ये नगरपरिषद व नगरपालिका व्हावी, यासंदर्भात प्रस्ताव मांडला आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा करुन नंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आगामी काळात पोलीसांचा वाहतूक विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामात हलगर्जीपणा झाल्यास त्यांच्याविरोधात नागरिकांकडून आयोजित आंदोलनाचे नेतृत्व माझ्याकडे असेल, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.
पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक
नगर महामार्गाच्या धर्तीवर सोलापूर महामार्गावर एलेव्हेटेड सहापदरी, दुमजली फ्लायओव्हर बांधण्यासंदर्भात पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. फ्लायओव्हरवरुन मेट्रो वाहतूक व लांब पल्ल्याची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. नगर व नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळाले आहे. आता सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. पुणे शहराबाहेरुन जाणारा रिंगरोड लवकर सुरु व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. महामार्गालगत अतिक्रमण काढण्यासाठी राजकीय दबाव झुगारून अधिकाऱ्यांनी काम करावे. या संदर्भात अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.