नाराजीच्या चर्चांना सुनील राऊतांकडून पुर्णविराम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा पहिला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात 36 जणांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना डावलवण्यात आल्याने नाराजीचा सूरही उमटताना दिसला. महाविकास आघाडी स्थापण करण्यात मोलाचा वाटा असणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न देण्याचा निर्णय घेत धक्कातंत्राचा अवलंब केल्याने शिवसेनेत सारे अचंबित झाले. त्यातच संजय राऊत शपथविधीला गैरहजर राहिल्याने नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगली. काही प्रसारमाध्यमांनी सुनील राऊत राजीनामा देणार असल्याचे वृत्तही दिले. परंतु, या सर्व चर्चाना आणि वृत्ताला खुद्द सुनील राऊत यांनीच पुर्णविराम दिला आहे.
सुनील राऊत यांनी अखेर याबाबत खुलासा करत, आपण पक्षावर नाराज नसल्याचे म्हटले. तसेच मी शिवसेनेचा आमदार असलो तरी आधी एक कडवट शिवसैनिक आहे असे सांगत सुनील राऊत यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले. आपण राजीनामा देत असल्याचे वृत्त निराधार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे सर्व चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगत सुनील राऊत यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मी शिवसेनेचा आमदार असलो तरी आधी कडवट शिवसैनिक आहे. मी आमदार पदाचा राजीनामा देणार नाही. हे वृत्त चुकीचे आणि निराधार आहे. राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार राज्यात आलं आहे यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट नाही. त्यामुळे नी नाराज असण्याचा प्रश्नच नाही, असे सुनील राऊत यांनी सांगितले आहे.