नवी दिल्ली : भारत-चीन दरम्यानच्या सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनने भारतीय हद्दीत गाव वसवल्याची माहिती समोर आली. सॅटेलाइट फोटोतून ही बाब स्पष्ट झाली असून, आता यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या विधानांचे स्मरण करून देत हल्लाबोल केला आहे.
चीनने अरूणाचल प्रदेशात गावच वसवले आहे. समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोतून ही बाब स्पष्ट झाली आहे. चीनने तब्बल १०१ घरे बांधली असून, भारतीय सीमेपासून साडेचार किमी आतमध्ये येऊन चीनने हे बांधकाम केल्याचे फोटोतून दिसून येत आहे. या घटनेवर चिंता व्यक्त करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
Remember his promise- “मैं देश झुकने नहीं दूँगा।” pic.twitter.com/NdXT4hqkNK
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 19, 2021
चीनने अरुणाचलमध्ये गाव वसल्याच्या वृत्ताचा फोटो ट्विट करत “मैं देश झुकने नहीं दूँगा, हे त्यांचं वचन आठवतंय का?,” असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.
सॅटेलाईट फोटोतून दिसून आलेल्या दृश्यात चीनने अरुणाचलमध्ये हे गाव वसवले असून, हे फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजी आहेत. चीननं ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवलं असून, या गावात घरंही बांधल्याचे दिसत आहे. सरकारी नकाशानुसार हा भाग भारतीय हद्दीत येतो, मात्र, १९५९ पासून त्यावर चीनने कब्जा मिळवलेला आहे. पूर्वी इथे फक्त चिनी सैन्याची चौकी होती. मात्र, नव्या छायाचित्रात इथे गाव वसवण्यात आल्याचे दिसत आहे.