साउथम्पटन – स्वतःला ज्या दिवशी महान गोलंदाज समजायला लागेन त्याच दिवशी क्रिकेटमधून निवृत्ती घेईन, अशा शब्दांत भारताचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने टीकाकारांना फटकारले आहे. अश्विन स्वतःला महान गोलंदाज समजत असावा, अशा शब्दांत काही दिवसांपूर्वी त्याच्यावर काही समीक्षकांनी टीका केली होती.
प्रतिस्पर्धी संघातील दादा फलंदाजांमुळे आपल्या गोलंदाजीत सुधारणा होते. पण ज्या दिवशी मला अहंकार निर्माण होईल व स्वतःमध्ये कोणत्याही सुधारणेची गरज नाही, असे वाटू लागेल, त्या दिवशी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारेन, असेही अश्विन म्हणाला. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने अचूक राहणे महत्त्वाचे असते.
माझ्या गोलंदाजीत जास्तीत जास्त अचूकता यावी, यासाठीच नेट सरावात मी सातत्याने मेहनत घेत असतो. हाच विचार ठेवून मी कारकिर्दीत यश मिळवले. मात्र, माझ्यात अहंकार नाही व तो निर्माणही होणार नाही यावर माझे कायम लक्ष असते. जर कधी माझा अहंकार जागृत झाला व माझ्यात काही सुधारणा करण्याची गरज नाही असे वाटू लागले तर निवृत्ती स्वीकारेन, असेही अश्विनने सांगितले.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 बळींचा आकडा पार केला आहे. आता आपली कारकीर्द जास्त जबाबदारीने घेण्याची गरज आहे. टीकाकार काय बोलतात याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामगिरीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी प्रत्येक सामन्याचा गांभीर्याने विचार करतो. आधी झालेल्या कामगिरीपेक्षा पुढील सामन्यात जास्त सरस कामगिरी कशी करता येईल याकडे पाहतो, असेही त्याने सांगितले.