मुंबई – आपली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी झालेल्या नियुक्तीवर मी नाखूषच होतो. आपली योग्य ठिकाणी नियुक्ती झालेली नाही असे मला वाटत आले आहे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे. राजभवनात जैन समाजाच्या झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, राज्यपाल नियुक्तीनंतर मला अजिबात आनंद झाला नाही. तथापि राजभवनात जेव्हा संन्यासी किंवा मुमुक्षरत्न येतात तेव्हा आपल्याला आनंद होत असतो असे ते म्हणाले.
भविष्यात पर्यटन उद्योगासारखे तीर्थक्षेत्र उद्योग सुरू करण्याची विनंतीही आपण सरकाला केली आहे.पर्यटन मंत्रालयासारखे तीर्थक्षेत्र मंत्रालयही सरकारी पातळीवर असले पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तीर्थस्थळांना या देशात फार महत्व असून लाखो लोक तेथे यात्रा करीत असतात. राज्याच्या पर्यटन विभागातर्फे शुक्रवारी राजभवन येथे ‘पवित्र जैन तीर्थक्षेत्र दर्शन सर्किट’चे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, वैष्णोदेवी मंदिर मंडळाचे सदस्य महामंडलेश्वर श्री विश्वेश्वर आनंद गिरी महाराज हे देखील उपस्थित होते.
भगतसिंग कोश्यारी यांची सप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून अनेक वेळा ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत.