नवी दिल्ली : केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात फटाक्यांनी भरलेले अननस खाल्ल्यामुळे गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये याच्या बातम्या यायला लागल्यानंतर, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याची होणारी बदनामी पाहून आपल्याला खूप दुःख होत असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.
केरळ पोलीस आणि वन-विभागाने याप्रकरणी पावले उचलत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी पोलीसांनी ३ संशयितांवर काम करत असून, हत्तीणीच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकार करेल असेही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.
हत्तीणीला जंगल सोडून गावात येऊन हे फळ का खावे लागले याचाही सरकार तपास करेल असं विजयन यांनी स्पष्ट केलं. मात्र या प्रकरणावरुन सोशल मीडियावर केरळ सरकारच्या होणाऱ्या बदनामीविरोधात विजयन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “या प्रकरणाचा आधार घेऊन काही लोकं केरळ सरकार आणि जनतेविरोधात गरळ ओकत आहेत, हे पाहून मला दुःख झालं. केरळमधील जनतेने नेहमी अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. अपुरी माहिती आणि अर्धसत्याच्या आधारावर सरकारविरोधात अजेंडा राबवण्याचं काम सुरु आहे. काही घटकांकडून या दरम्यान चुकीचा पायंडाही पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
केरळ वन-विभागाचे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे हत्तीणीवर झालेल्या अत्याचाराची गोष्ट सर्वात प्रथम प्रसारमाध्यमांसमोर आली. यानंतर सोशल मीडियावर या घटनेविरोधात संताप व्यक्त होऊ लागला. अनेक सेलिब्रेटींनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.