मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांचं पाकिस्तान आणि दाउदशी कनेक्शन असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी रियाज भाटी याचे आणि फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर रियाज भाटी समोर आला असून आपण राष्ट्रवादीत होतो, असा दावा त्याने केला आहे.
मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे रियाझ भाटी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशीही रियाझचे सबंध असल्याचं समोर येत आहे.
रियाझचा दाऊदच्या टोळीशी संबंध आहे. त्याच्यावर फसवणूक, खंडणी वसुली, जमीन बळकावणे आणि फायरिंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 2015 ते 2020 मध्ये बनावट पासपोर्ट बाळगल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यावेळी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत देश सोडून पळून जाताना त्याला अटक करण्यात आली होती, असही मलिक यांनी म्हटलं होतं.
दरम्यान रियाज भाटीने म्हटलं की, मी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मार्केटींग कमेटीमध्ये आहे. त्यामुळे आशिष शेलार यांची भेट झाली आहे. माझा बीजेपीशी काही संबंध नाही.
राष्ट्रवादीची निर्मिती झाली, त्यावेळी मी राष्ट्रवादी युथ नॉर्थ-वेस्ट डिस्ट्रीक्टचा जनरल सेक्रेटरी होतो, असं भाटीने सांगितलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो कसा, याचं स्पष्टीकरण भाटीने दिलेलं नाही.