नवी दिल्ली – एकेकाळी क्रिकेट खेळण्यासाठी साहित्य नव्हते. पायात घालायला बूटही घेण्याची ऐपत नव्हती. तो काळ आठवला की आजही अंगावर काटा येतो. आज क्रिकेटने मला सर्व काही दिले. मात्र, तरीही गरिबीच्या झळा आजही आठवतात, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या भावना व्यक्त केल्या.
क्रिकेट खेळण्याची जिद्द खूप लहान असल्यापासूनच होती, पण घरची परिस्थिती इतकी बिकट होती की, पायाभूत सुविधांचीही वानवा होती. क्रिकेटमध्ये नाव कमवायचे ही जिद्द मात्र होती. पायात घालायला बूट विकत घेण्याइतकेही पैसे नव्हते. मात्र, धैर्य, चिकाटी, प्रामणिकपणा व गुणवत्ता असेल तर अशा अनेक संकटांवर मात करता येते हे मी स्वानुभवाने सांगू शकतो, असे कुलदीपने सांगितले.
जेव्हा क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली तेव्हा जिद्द होती. मात्र, पैसे नव्हते. क्रिकेटचे साहित्य, बूट, बॅट तसेच आवश्यक गोष्टी घेण्यासाठी पैसे कोण देणार हा मोठा प्रश्न होता. ते दिवस आठवले की आजही अंगावर काटा येतो. त्या गरिबीतून बाहेर पडलो असलो तरीही मला जेव्हा असा कोणी खेळाडू भेटला की ज्याच्याकडे क्रीडा साहित्यासाठी पैसे नाहीत तर त्याला नेहमी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. खेळाडू क्रिकेटचा असो किंवा अन्य कोणत्या क्रीडा प्रकारातील मी नेहमी त्याला मदत करण्यासाठी प्राधान्य देतो. ज्या समस्यांचा मी सामना केला ती वेळ कोणावरही येऊ नये असे मला वाटते, असेही कुलदीप म्हणाला.