कोलकता, -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नंदीग्रामच्या भूमीतून मी कधीच रिकाम्या हाताने परतले नाही, असे म्हणत ममतांनी मतदारसंघ बदलला असला तरी विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला.
सुमारे 2 किलोमीटर अंतराच्या रोड शोमध्ये सहभागी होत ममता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित कार्यालयात पोहचल्या. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममतांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत नंदीग्रामला असलेले महत्व अधोरेखित केले. नंदीग्राम हे केवळ कुठल्या ठिकाणाचे नाव नसून आंदोलनाचे नाव आहे. एकवेळ मी स्वत:चे नाव विसरेल; पण नंदीग्रामचे नाही, असे त्या म्हणाल्या. नंदीग्राममध्ये काही वर्षांपूर्वी भूसंपादन विरोधी आंदोलन झाले. त्या आंदोलनाने ममतांच्या सत्तेचा मार्ग सुकर केला. यावेळच्या निवडणुकीत ममतांच्या उमेदवारीमुळे नंदीग्राम पुन्हा चर्चेत आले आहे.
नंदीग्राम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीच्या तोंडावर ममतांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. एकेकाळी ममतांनंतरचे तृणमूल कॉंग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून अधिकारी यांच्याकडे पाहिले जात होते. आता ममता आणि अधिकारी यांच्यात नंदीग्राममध्ये मुकाबला रंगणार आहे. भवानीपूर मतदारसंघ सोडून ममतांनी नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेताना अधिकारी यांच्याबरोबरच भाजपलाही आव्हान दिले आहे. नंदीग्राममध्ये ममतांनी भाडेपट्ट्यावर एक घर घेतले आहे. तिथूनच त्या प्रचाराची सुत्रे हलवणार आहेत.