मुंबई – मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे. औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचा उद्योग सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. मराठवाड्यातील प्रकल्प मंजूर करण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला असे वक्तव्य भागवत कराड यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.
फ्लोटींग सॉलर पॅनल प्रॉजेक्टबाबत भागवत कराड यांनी फक्त पत्र लिहिले होते. त्यामुळे सरकार फक्त पत्रावर चालत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. खरंतर केंद्राच्या एनटीपीसीकडून प्रस्ताव यायला हवा होता मात्र भागवत कराड यांनी राज्यसरकारकडे पत्र दिले. तरी केंद्रीय मंत्री असल्याने आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेतली व एक समिती गठीत केली. एप्रिलच्या शेवटी पत्र आले आणि जूनच्या सुरुवातीला आम्ही याबाबत समिती गठीत केली. त्यामुळे प्रकल्प घालवला हे सांगणे चुकीचे आहे. मी नकार दिला आहे असे म्हणत असतील तर एकतरी कागद दाखवा असे असे आव्हान जयंत पाटील यांनी केले आहे.
भागवत कराड यांना राज्यसभा नाही तर औरंगाबादमध्ये लोकसभेला भाजपने उभे राहायला सांगितले आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. निवडणूक लढवायची असेल तर लढवावी पण खोटं बोलू नये. असे म्हणत माझ्यादृष्टीने त्यांना मी जास्त महत्त्व देत नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
आम्ही नाचत नाही आम्ही जे काही करायचं असते ते ‘करेक्ट’ करतो. त्यांना आता काही जमत नसेल म्हणून लोकांना प्रभावित करण्यासाठी ते अशी विधाने करत असतील तर त्यांनी जयंत पाटील यांनी नकार कधी दिला, नकार पत्र आमच्याकडून कधी गेले, त्यांना कुणी नाही म्हटले याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.