सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपूर्वी साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. तुम्ही त्यांना का भेटला नाही, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, याची मला कोणी कल्पना दिली नव्हती. लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कळवायला हवे होते. माझ्या ऑफिसला त्यांच्या दौऱ्याचे पत्र यायला हवे होते. त्यांना वाटते आम्हालाच दौरे पडतात. त्यामुळे आम्हाला कोणी दौरे कळवत नाही. मुळात अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख,कृषिमंत्री दादा भुसे आदी मंत्री नुकतेच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. मात्र या दौऱ्याची पुसटशी कल्पना खासदार या नात्याने प्रशासनाने दिली नाही. यामुळे त्यांना भेटता आले नाही. सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचा दीर्घ काळ प्रलंबित प्रश्न ,अपुऱ्या प्रकल्पांची चर्चा व हे प्रकल्प तडीस नेण्याचा ठोस निर्णय या बैठकीत अजित पवारांनी घेतला.
याशिवाय साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर हा उदयनराजेनी पाठपुरावा केलेला प्रकल्प तातडीने पूर्ण करावा. त्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखरसिंह यांची समितीकडे त्यांनी वैद्यकीय महाविद्याल्यासह, ग्रेड सेपरेटरसह अनेक अपुऱ्या प्रकल्पांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सोपविली.
त्याप्रमाणे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील आदींना बरोबर घेतले. मात्र उदयनराजें अनुपस्थितीत होते. याविषयी पत्रकारांनी विचारले असता उदयनराजे म्हणाले, लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कळवायला हवे होते. त्यांना वाटते आम्हालच दौरे पडतात. त्यामुळे आम्हाला कोणी दौरे कळवत नाही. मुळात अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असा टोलाही त्यांनी प्रशासनाला लगावला.