नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी (बुधवारी) राज्यसभेमध्ये महिला खासदारांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. राज्यसभेमध्ये महिला खासदारांवर झालेला हा हल्ला केंद्र सरकार पुरस्कृत असल्याचा आरोपही विरोधी पक्षाचे नेते करत आहेत.
अशातच आज (गुरुवारी) विरोधी पक्षांच्या एका शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणाचा व या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांची भेट घेतल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
पवार यांनी याबाबत आपल्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. ते लिहतात, “विरोधीपक्षांच्या शिष्टमंडळाने आज उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांची भेट घेतली. यावेळी राज्यसभेतील बुधवारी झालेल्या गोंधळाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीवेळी सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केंद्र सरकारच्या लोकशाहीविरोधी वर्तणुकीचा निषेध नोंदवला.”
“माझ्या 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत महिला खासदारांना अशा प्रकारची वागणूक दिल्याचं मी आतापर्यंत पाहिलं नाही” असं देखील पवार यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.
विरोधकांचा विजय चौकापर्यंत मोर्चा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी राहुल गांधी यांनी देखील महिला खासदारांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच आम्हाला संसदेमध्ये बोलू दिल जात नाही.
आम्ही शेतकरी कायदे, पेगॅसस प्रकरण हे मुद्दे संसदेमध्ये उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला बोलू दिलं नाही, यामुळेच आम्ही तुमच्याशी संवाद साधला इथपर्यंत आलो आहोत असं गांधी म्हणाले.
संजय राऊतांचा गंभीर आरोप
मार्शलच्या वेशात राज्यसभेत आलेल्या लोकांनी महिला खासदारांना मारहाण केली, असा गंभीर आरोप शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लगावला. राऊत यांनी देखील विजय चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता.