नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे.आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे, तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले आहे.
मात्र, हा दौरा रद्द करण्यामागे भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचाही हात असल्याचे मानले जात असून, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी सातत्याने करत होते. दरम्यान, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतरही भाजप खासदार गप्प बसले नाहीत, ठाकरे यांची कधीतरी भेट झाली तर नक्कीच दोन हात करू, असे ते म्हणाले.
एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह देवरिया येथे पोहोचले होते. यावेळी राज ठाकरेंबद्दल ते म्हणाले,’राज ठाकरे यांचा 2008 पासून त्यांचा शोध घेतोय. राज ठाकरे कधीतरी विमानतळावर भेटले तर त्याच्याशी नक्कीच दोन हात करेल.’ असेही ते म्हणाले.
ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले,’आता राज ठाकरे यांचे मन बदलले असून त्यांना अयोध्येत यायचे आहे, मात्र जोपर्यंत ते उत्तर भारतीयांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. आम्ही सर्व रामाचे वंशज आहोत आणि त्यांनी त्यांचा अपमान केला आहे, मारहाण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे माफी मागितली तरच राज ठाकरे उत्तर प्रदेशमध्ये येऊ शकतात.”
ब्रिजभूषण शरण सिंह पुढे म्हणाले की, ‘राज ठाकरे उत्तर भारतात जिथे जातील तिथे त्यांना विरोध होईल. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे कुठेही फिरू शकणार नाही.’ दरम्यान, बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंचा विरोध आपण पक्षाचं काम म्हणून करत असल्याची माध्यमांशी बोलतांना कबुली दिली.