मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत येत असतात. मुंबईबाबत नुकतेच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते. यानंतर त्यांना जाहीर माफीदेखील मागावी लागली. दरम्यान, माध्यमांशी न बोलण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्याचा खुलासा त्यांनी आज केला आहे.
महाराष्ट्र सदनात त्यांच्या हस्ते “हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांनी बोलणे टाळणे, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच त्यांनी पाठ फिरवली. राज्यपाल काढता पाय घेत असतानाच प्रसारमाध्यमांशी दोन-चार मोघम वाक्ये बोलले. माध्यमांचा आग्रह पाहता मी बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला. मला बोलायचेच नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत, अशी दोन चार मोघम वाक्ये त्यांनी बोलली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरून भाजपश्रेष्ठींकडून त्यांना न बोलण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. गुजराती आणि मारवाडी लोक महाराष्ट्रातून निघून गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.