नवी दिल्ली – दुहेरी मतदान ओळखपत्रांच्या मुद्दयावरून भाजपचा उमेदवार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीरने “आप’वर सडकून टीका केली आहे. “आप’च्या अतिषी यांच्याविरोधात पूर्व दिल्ली मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या गौतम गंभीरने “आपल्याकडे राजेंद्र नगर येथील एकच मतदान ओळखपत्र आहे. मी करोलबाग येथे रामजास रोडवर माझ्या आजी आजोबांसह राहतो. मात्र तेथून कधीही मतदान केलेले नाही. अन्य मतदान ओळखपत्रासाठी अर्जही केलेला नाही. ‘असेही तो म्हणाला.
“आप’च्या उमेदवार अतिषी यांनी गौतम गंभीरकडे राजेंद्र नगर आणि करोलबाग या दोन्ही ठिकाणची मतदान ओळखपत्रे असल्याचा आरोप केला होता. त्याला गंभीरकडून हे प्रत्युत्तर दिले गेले. आतिषी यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही आणि नागरिकांसाठी कोणतीही दृष्टी नसल्यामुळेच आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असे गौतम गंभीर म्हणाला.
आतिषी यांनी गौतम गंभीर विरोधात केलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या तक्रारीच्या आधारे दिल्लीतील न्यायालयाने 1 मे रोजी सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे. एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असल्याने गंभीरने लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आतिषी यांनी केला आहे.