नाईट लाईफच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई : मुंबईतील नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली होती. मुंबईत 26 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या नाईट लाईफच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक शहराची स्वतंत्र संस्कृती असल्यामुळे नाईटलाइफचा प्रस्ताव राज्यभर राबवणे योग्य ठरणार नाही. मुंबईत ठराविक ठिकाणी हे प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो. मूळात मला नाईटलाइफ हा शब्दच आवडत नाही,असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले.
नाईट लाईफ सुरू करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले. एका इंग्रजी वर्तमानपत्राने या विषयीचे वृत्त दिले आहे. सुरुवातीच्या काळात निवडक भागात मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल 24 तास खुले ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वांचे मूल्यांकन करता येईल. त्यातून लोकांच्या तक्रारीही दूर करण्यात येतील.
16 जानेवारी रोजी आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रमुख, मॉल आणि हॉटेल असोसिएशनच्या प्रमुखांची भेट घेतली होती. काळा घोडा, वांद्रे कुर्ला संकुल आणि नरिमन पॉईंट सारख्या अनिवासी भागात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी याची सुरूवात होणार आहे. नाईट लाईफ संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरक्षेचं कारण पुढे केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी या निर्णयाला अनुकूल असल्याचं म्हटलं होतं.