आपण मात्र त्यांना आलिंगनच दिले
शुजालपूर (मध्यप्रदेश) – भाजप, संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या कुटुंबाविषयी द्वेष वाटतो आहे. मात्र त्यांच्याबाबत आपल्या मनात द्वेष नसून केवळ प्रेमच असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी सातत्याने आपले वडील राजीव गांधी, आजी इंदिरा गांधी आणि पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करत असतात. मात्र मोदींना मात्र आपण प्रेमपूर्वक आलिंगनच दिले आहे. आपल्या मनातील प्रेम भावनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करेल, असेही राहुल गांधी म्हणाले.
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना “मिस्टर क्लीन’ असे त्यांच्याच सहकाऱ्यांकडून संबोधले जात असेल्. मात्र त्यांचा शेवट “1 नंबरचे भ्रष्टाचारी’ असा झाला असल्याचे मोदी आठवड्याभरापूर्वी एका जाहीर सभेमध्ये बोलताना म्हणाले होते. राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय आयएनएस विराटला वैयक्तिक टॅक्सी समजून तेथे फिरायला गेले होते. ही नौका लक्षद्वीप येथे असताना या नौकेवर ते 10 दिवस पर्यटनासाठी गेले होते, असा आरोप मोदींनी केला होता, त्याचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला. संसदेत राफेलबाबत प्रश्न विचारल्यावर मोदी राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि नेहरूंवर टीका करतात, मात्र प्रश्नांची उत्तरे देत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले. भाजप, संघ आणि मोदी हे आपल्या कुटुंबाचा द्वेषच करतात. हा द्वेष हटवणेच आमचे काम आहे. मोदी माझ्याबाबत, माझ्या कुटुंबीयांबाबत रागाने बोलतात. पण मी मात्र त्यांना “झप्पी’च दिली आहे, असे राहुल म्हणाले.
मोदींना जेंव्हा वाटेल तेंव्हा ते माझ्याबाबत द्वेषपूर्वक बोलू शकतात. पण मी तसे करणार नाही. मोदींनी प्रेमाच्या आधारे द्वेष दूर केला पाहिजे. याचा तुम्हालाच फायदा होईल. द्वेषाने कोणीही विजय मिळवू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
न्याय योजनेतून देशवासियांना 5 वर्षात 3.60 लाख रुपये दिले जातील. ही कल्पना आपल्याला मोदींकडूनच मिळाली. यातून लोक वीजेची खरेदी करतील. त्यामुळे देशातील अर्थकारणाला चालना मिळेल. नोटबंदी आणि जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीवरही राहुल गांधी यांनी टीका केली.