रत्नागिरी : नारायण राणे आणि शिवसेना यांचायतील राजकीय वितुष्ट हे सर्वज्ञात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाकरता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे येत आहेत. त्यांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, या अगोदर नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची चर्चाच सर्वत्र होत होती. यावर आता खुद्द नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचे शिवसेना सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते. 11 जानेवारी रोजी राऊत यांनी याबाबतचे वक्तव्य केले होते. यावर विचारले असता नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या परवानगीचा काहीही संबंध हा राज्याशी येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला नव्हता. विनायक राऊत यांच्या बोलण्यात किंवा दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे राणे यांनी म्हटले होते.
11 जानेवारी 2021 रोजी नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. पण, केवळ महिनाभराच्या आतच होय, माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं अशी कबुली त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 6 फेब्रुवारी रोजी अर्थात कालच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याची कबुली दिली. दरम्यान, उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं याबाबत बोलताना त्यांनी आपल्यातील आक्रमकपणा मात्र कायम ठेवला होता, हे विशेष.
मेडिकल कॉलेजचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. असं असलं तरी तुम्हाला राज्य सरकारकडून काही त्रास झाला का? असा सवाल नारायण राणे यांना कालच्या अर्थात 6 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत विचारला गेला होता. यावर बोलताना नारायण राणे यांनी ‘मला त्रास द्यावा इतकी या सरकारची क्षमता नाही. हे माझं काय करू शकतात? परवानग्या नाकारल्या तर कोर्ट आहे ना! कोर्ट बोलल्यावर घाबरतात हे. मला काही अडचण नाही आली. यावेळी चर्चा वगैरे काही झाली नाही. ज्यावेळी जीआर काढायचा होता, त्यावेळी बोललो जीआर काढा कळू दे महाराष्ट्राला कॉलेज आणलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री बोलले हो काढतो. बाकी काही बोलले नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.