शाळेतले, बालपणीचे बरेच खेळ हे जगण्याचे धडे असतात. वरवर पहाता ते मजेचे किंवा क्षुल्लक गमतीचे भासतात. पण त्या प्रत्येकातून एक भक्कम आणि पायाभूत धडा मिळत असतो. तेव्हा समजत नाही. आयुष्याचं वर्तुळ निम्मं होत आलं की सावकाश अर्थ उतरत जातात. अगदी सोप्यात सोपा कानगोष्टीचा खेळ आठवा बरं. पटेल तुम्हालाही.
झ्या आईचा जन्म बेळगावचा. त्यामुळे तिची मातृभाषा कानडी. माझा जन्म मुंबईत, शिक्षण मराठीत. त्यामुळं कानडी अगदी मोजकं येतं. म्हणजे, “कन्न बरांगिल्ला’ हे सांगण्यापुरतच येतं. किंवा स्वार्थपुरतं ह्यांना,रोक्का कोडू असं हक्कानं मागण्या इतपत!
माझ्या ताईला मात्र बोलता येतं कारण ती चौथीत असताना, हुबळीला एक वर्षं तिथल्या कन्नड शाळेत शिकली. मग परत आल्यावर ती सवयीनं कानडी बोलत राहिली आणि मग आई ताईची ती एक वेगळी संवादभाषा झाली. आई आणि ताई बऱ्याचदा कानडीत बोलायच्या. अशा वेळी मला त्यांच्या खासगी जगातून वगळल्यासारखे वाटायचं. उगाच आपल्याच बद्दल काही बोलताहेत असं. रागही यायचा. त्या हे हसण्यावारी न्यायच्या.
आईनं वाचन आणि चर्चा अशी दोन उत्तम वळणं मेंदूला दिली. जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही विषयावर खुलेपणानं बोलण्याची आम्हाला परवानगी होती. घरी येणारे जाणारे सुद्धा यात सामील असायचे. घरात असलेली आणि मिळतील ती पुस्तकं वाचण्याचं व्यसनच होतं. समोर अन्न ठेवून हातात एकेक पुस्तक घेऊन आम्ही जेवायला बसायचो. नंतरच्या काळात लोक टीव्हीसमोर बसून जेवू लागले. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो. कालाय… असो. मग कधीकधी वादाचे फड रंगत. वर्ण्य विषयावर मत मांडणी खोडणी चालायची.
शाळकरी वयातल्या माझ्या विश्वाबाहेरचे काही असले की थोडा गोंधळ होई. थोडाच. कारण मुळात विषयाला बंधन नसल्यानं मुक्त चर्चा असे. अमुक एक विषय या वयात ऐकला वा बोलला जाऊ नये हे नव्हतं. तरीही वयाची म्हणून एक आकलन क्षमता असतेच की. परिघाबाहेरच्या अनेक गोष्टी माहिती झाल्या तरी “समजत’ नसत. मग कधी गोंधळ झाला की उगाच वाद नको म्हणून आई ताईला सांगायची, “हुं अनं हेळतेन’. तिला हो म्हणून टाक!
खूप लवकर यातली मेख लक्षात आली. आता हे बरं उपयोगी पडतंय. एका मर्यादेपल्याड कुणालाही काहीही सांगणं, समजावणं निरर्थक ठरतं कारण ज्याची त्याची धारणा पक्की झालेली असते.
आपापल्या अनुभव आणि मगदुराप्रमाणे दृष्टिकोन, मतं ठाम बनलेली असतात. मग वाद घालणं, चर्चा हे विफल ठरतं. तसंही जगाचा नियम आहे की कुणीही व्यक्ती फक्त तेच ऐकते वा पहाते जे तिला वा त्याला ऐका पहायचं असतं. बाकीचं सगळं पालथ्या घड्यावरल्या पाण्यासारखं वाहून जातं. बोलून काय फायदा? मग समोरचा जे म्हणेल त्याला फक्त हो म्हणून टाकायचं आणि शांतपणे वाट पहायची. समोरच्याला समजेल तेव्हा समजेल आणि उमजेल तितकंच उमजेल. व्यर्थ श्वास आणि बोल फुकाचे घालवायचे नाहीत. नकारार्थी ऊर्जा स्वतःकडे घ्यायची नाही. वय वाढतंय तसं हे ओझं झेपेनास होतंय.
अनुभवाअंती समस्त जगाला हो म्हणून टाकलेलं आहे. कसलेही वाद विवाद, चर्चा नकोत. शांतपणे आपली मत आपल्यापाशी ठेवून समोरच्याला मान डोलवायची. जगणं सोपं होतं. याचा अर्थ चुकीच्या गोष्टी ऐका किंवा करा असं नाही हो. फक्त शाब्दिक विरोधात वेळ नि ताकद वाया घालवायची नाही. दमणूक निम्म्यानं टळते.
मला कानडी येत नसल्यानं, मी मराठीतच हुं अनं हेळतेन म्हटलंय. पण भावना पोचली की झालं. तिला कुठे भाषेचे बंधन असते? बंधन विचारांच्या आड येते. पाणी वाहतं होईल तेव्हा होईल. नाही झालं तरी साठलेल्या पाण्यात कमळ फुलतंच की! आपण आयुष्याला हो म्हणू या.
सुचरिता