मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात जो घोळ झाला त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. याविषयी बोलताना, ‘महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार होतं. एका किमान समान कार्यक्रमावर तीन भिन्न पक्ष एकत्र होते. ज्या पद्धतीने आम्ही सरकार चालवलं. तोच समन्वय आणि तोच एकोपा विरोधी पक्षात असताना असायला हवा. तरच आपण पुढे जाऊ शकतो असे राऊत यांनी म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकीत जो गोंधळ झालाय तो झालाच आहे. त्याकडे महाविकास आघाडी म्हणूनच पाहिले गेले पाहिजे, असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, मी कुणालाही दोष देत नाही पण सध्या मविआमध्ये समन्वय दिसत नाही. विरोधी पक्षात काम करतानाही समन्वय असला पाहिजे. नागपूर आणि नाशिकच्या जागेसाठी चर्चा व्हायला हवी होती असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भविष्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाहीत. नाशिकमध्ये जे घडलं त्यासाठी आम्ही दोष देणार नाही. मात्र समन्वय ठेवणं आवश्यक आहे. महाविकास आघाडीत निर्णय घेताना समन्वय ठेवणं आवश्यक आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तांबे कुटुंब हे निष्ठावान आहेत. पूर्वापार ते काँग्रेसशीच संबंधित आहेत. मात्र नंतर सत्यजित तांबेंनी काय निर्णय घेतला हे जर आम्हाला माहित नसेल काँग्रेसला माहित नसेल तर काय करता येईल? तांबे कुटुंब आणि गांधी घराण्याचे संबंध चांगले आहेत. सत्यजित तांबे यांनी जी चूक केली आहे ती त्यांची चूक आहे. त्याकडे काँग्रेसची चूक म्हणून पाहता येणार नाही. जे काही नाशिकमध्ये घडलं आहे ते घडायला नको होतं. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मी जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. मी रोज भारत जोडो यात्रेची माहिती घेतो आहे. त्यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मी आत्ता निवडणुकांविषयी बोलणार नाही. पण भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या यात्रेमुळे जागरुकता निर्माण होते आहे. असेही संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले.