कोलकाता – चक्रीवादळाच्या धोक्याच्या संबंधात चर्चा करण्यासाठी आपण ममता दिदींना फोन कॉल केला होता पण उद्दाम दीदींनी माझ्या कॉलला प्रतिसादही दिला नाही अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. त्याला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी तितक्याच कठोर शब्दात मोदींवर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की एक्सपायरी डेट संपलेल्या पंतप्रधानांबरोबर मला बोलायची इच्छा नाही. मोदी हे चक्रीवादळाचेही राजकारण करीत आहेत असे त्या म्हणाल्या.
बंगालच्या तामलुक येथील सभेत बोलताना मोदींनी ममतांनी आपला फोनही घेतला नाही, मला पश्चिम बंगालच्या वादळग्रस्तांविषयी त्यांच्याशी बोलायचे होते पण त्यांच्यातील उद्दामपणा आड आला असे नमूद केले होते. त्याला ममतांनी वरील प्रत्युत्तर दिले.
विष्णुपुरच्या सभेत या विषयी बोलताना ममता म्हणाल्या की मी वादळाच्या स्थितीची पहाणी करण्यासाठी त्यावेळी खरगपुरला गेले होते पण मोदी त्यावेळी प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे मी त्यांचा कॉल घेऊ शकले नाही. पण एक्सपायरी डेट संपलेल्या पंतप्रधानांशी बोलायची माझी इच्छाही नव्हती अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली. नंतर मोदींनी पश्चिम बंगाल मधील भेटीच्यावेळी वादळग्रस्त भागाची माहिती घेण्यासाठी बैठक घेतली त्यालाही त्या उपस्थित नव्हत्या. त्यासंबंधात त्या म्हणाल्या की ते येथे प्रचारासाठी येतात आणि बैठकीचे कारण देतात. त्यांच्या समवेत मी बैठकीला बसू शकत नाहीं. ज्यांची मुदत आता संपत आली आहे त्यांच्याशी बैठक करण्यात काय अर्थ असा सवालही त्यांनी यावेळी केला.