राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत देत राज्याच्या राजकरणात खळबळ उडवून दिली. काल रात्री उशिरा राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली त्यावेळी पवारांनी शिंदे सरकार केव्हाही कोसळेल असे भाकीत वर्तवले होते. मात्र हे सरकार सुरळीत चालेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी आधीच्या सरकारमधून का बाहेर पडलो तसेच आताच्या सरकारच भविष्य काय अशा अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं.
भाजप सेना युतीच्या काळात शिवसेनेकडून तुम्हाला मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती का ? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, मला मुख्यमंत्री करा अशी माझी मागणी किंवा अपेक्षा नव्हती. पण एक विचारसरणीचा, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विषय होता. पक्षातील कार्यकर्ते महाविकास आघाडीवर प्रचंड नाराज होते. आमदारदेखील नाराज होते. महाविकास आघाडीतील अंतर्गत समस्यांमुळे ते कोणतंही विकासकाम करु शकत नव्हते. असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिल.
५० आमदार एका बाजूला जातात याचा अर्थ काय? याचं कारण शोधायला हवं होतं.आमदारांना मतदारसंघात काम केलं नाही तर पुन्हा लोक निवडून देणार नाहीत याची भीती होती. ही अस्तित्वाची लढाई आहे. आम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही पक्ष सोडलेला नसल्याचं देखील शिंदेनी यावेळी स्पाष्ट केलं.
मुख्यमंत्री होण्यासाठी मी बंड पुकारलं नव्हतं तर बदल घडवण्यासाठी मी निर्णय घेतला आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले तसेच विधानसक्षा अध्यक्षांनी शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून माझी नियुक्ती केली आहे. भरत गोगोवले हेच प्रतोद आहेत. अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर अध्यक्षांनी निर्णय दिला असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.