पुणे – ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जे काम आम्हांला दिसत आहे ते समाधानकारक आहे. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे यांची पाठ थोपटली आहे. व्यापारी असोसिएशनच्या एका बैठकीला पवार उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.
“मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हातात सत्ता घेतली, त्यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांत गतीने पावले टाकण्यासंबंधीचा विचार केला होता; परंतु करोनाचे संकट आल्यावर त्यांचा प्राधान्यक्रम बदलला. त्यामुळे बाकीची सगळी कामे थांबवावी लागली. करोनाच्या विषयात मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दिवसातून 14 ते 15 तास बैठका होतात, हे मी पाहतो आहे. या बैठकांची आवश्यकताही आहेच. अशा काळात विरोधकांनी टीकाटिप्पणी करू नये, असे माझे मत आहे,’ असे पवार म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांना भेटायला पवार स्वत: जातात, आताही उपायुक्तांच्या बदल्यांच्या नाराजीमुळे ते चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. तसेच पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत जाणे चांगले नाही,’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर “आमच्यामध्ये कोणतीही अस्वस्थता, नाराजी नाही. राज्यासमोर जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी आम्ही एकत्र बसून त्याचा विचार करत असतो. त्यामुळे त्या भेटीत काही विशेष नाही.’ असे पवार म्हणाले.
तसेच “माझी दुसऱ्या कामासाठी एक मुलाखत मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ होती. मुख्यमंत्र्यांबरोबर माझ्या घरी बैठक करायची असेल, तर माझे घर तेथून 14 कि.मी. अंतरावर आहे. त्या ऐवजी जेथे मी गेलो होतो, तेथून एका फर्लांगावर मुख्यमंत्र्यांचे घर असेल तर मला तेथे जाण्यात काहीच कमीपणा वाटत नाही. चंद्रकांत पाटलांना त्याची चिंता वाटत असेल तर माझे काही त्यात म्हणणे नाही,’ असे म्हणत पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
मुख्यमंत्री घराबाहेरच पडत नाहीत, याविषयी विचारले असता, पवार म्हणाले की, “करोनाच्या संकटात नेतृत्त्व करणाऱ्यांनी बाहेर पडणे म्हणजे लोक जमतात. त्यामुळे शक्यतो प्रमुख लोकांनी बाहेर पडूच नये, असे माझे मत आहे. त्यांना नागरिकांशी बोलायचे असेल तर अनेक साधने उपलब्ध आहेत त्यावर बोलू शकतो.’ “पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या विषयात जे बोलले जात आहे, त्यात काही तथ्य नाही. “आयएएस’ आणि “आयपीएस’ च्या नेमणुका या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने केल्या जातात. आमच्यात यावरून कोणताही वाद नाही,’ अशी पवार यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांच्या सावध भूमिकेचे समर्थन
जो राज्यकर्ता असतो आणि ज्याच्याकडे संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी असते, त्याने नेहमीच सावधपणे आणि काळजी घेण्याची भूमिका घ्यायची असते. जी मुख्यमंत्री घेत आहेत. माझ्याकडे सत्ता नाही, त्यामुळे मला सूचना करायला काही अडचण नाही; परंतु एखाद्या भूमिकेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्या प्रशासकाची असते, त्यावेळी त्याला दहावेळा विचार करावा लागतो. अशावेळी सावधपणाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया देऊन पवारांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतल्या जात असलेल्या सावध भूमिकेचेही समर्थन केले.
मोदींच्या दौऱ्यात विशेष काही नाही
गलवान खोऱ्यात रस्ता बांधण्याच्या विषयावरून चीनचा काही समज-गैरसमज असू शकतो. तेथे रस्ता बांधण्याचे काम भारताचेच आहे. तो रस्ता शंभर टक्के भारताच्या हद्दीतच आहे. चीनचा प्रश्न “डिप्लोमॅटिक चॅनल’ने सोडवणे आवश्यक आहे. 1962 च्या चीन युद्धात पराभव झाल्यावरही पंडित नेहरू पंतप्रधान म्हणून तेथे गेले होते. तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सैन्याचे मनोधैर्य वाढवण्यासंबंधीची काळजी देशाच्या नेतृत्वाने घ्यायची असते. ती मोदी घेत आहेत, त्यामुळे त्यात मला काही विशेष वाटत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.