नवी दिल्ली – भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्हि. सिंधू हिने सोमवारी मी निवृत्त होत आहे, असे ट्विट केले होते. त्यावर चाहत्यांनी उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या. खरेतर अनिश्चितता, नकारात्मकता व निराशा यातून मी आता बाहेर आले असून मी या परिस्थितीतून मार्ग काढत निवृत्त झाले, असे तिला म्हणायचे होते. मात्र, तिच्या ट्विटमुळे तिने बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली असा चाहत्यांचा समज झाला होता.
करोनामुळे मानसिकताही नकारात्मक बनली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत मी त्यावर पूर्ण मात केली आहे. आता जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचणार आहे, असा निर्धार भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्हि. सिंधू हिने व्यक्त केला आहे.
करोनामुळे सगळेच हतबल झाले होते. आता कुठे त्यातून नागरिक बाहेर येत आहेत. मात्र, त्यांना पुन्हा एकदा सक्षम झालेले पाहण्यासाठी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. याच मानसिकतेत मी देखील अडकले होते. त्यावर मात करताना खूप मेहनत घ्यावी लागली. आता या नकारात्मकतेचा मी त्याग केला असून या सर्व निराशाजनक परिस्थितीतून मी निवृत्ती घेत आहे, असेही सिंधूने सांगितले.
करोनामुळे यंदा होत असेलली ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकली गेली असली तरीही माझे लक्ष्य विचलीत झालेले नाही. यंदाच्या काही स्पर्धा करोनाच्या भीतीमुळे मी खेळणे टाळले. पण जपानमधील ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे, असेही सिंधूने सांगितले.
सराव महत्त्वाचा….
यंदाच्या वर्षात पुढे काही स्पर्धा होत असून त्यात सहभागी होण्याचा माझा प्रयत्न राहील, अर्थात त्यापूर्वी करोनाच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल. ऑलिम्पिकला यश मिळवायचे असेल तर मला त्यापूर्वी सातत्याने सराव व स्पर्धा खेळणे खूप महत्त्वाचे आहे, असेही सिंधू म्हणाली.