कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्यानंतर पूर स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष पूरग्रस्त भागाची दौरे करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी आधीच पश्चिम महाराष्ट्रात असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी ठाकरे आणि फडणवीस आमने सामने आले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर पत्रकार परिषद घेतली. आपण नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहोत, यावेळच अस्मानी संकट मोठं आहे. अतिरिक्त पाण्याचं नियोजन करणे गरजेचे आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, आताच वेळ आहे असं म्हटलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांच्या पॅकेज संदर्भात भाष्य करताना विरोधकांवर निशाणा सुद्धा साधला आहे. पॅकेजची घोषणा करायला उशीर का असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यावर मी पॅकेज मुख्यमंत्री नसून लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री आहेत ते सुद्धा मदत करण्यासाठी तत्पर आहेत. संपूर्ण परिस्थिती आणि पंचनामा झाल्यावर मदत देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.
देवेंद्र फडणवीस हे इकडेच आहेत मला कळल्यावर मी त्यांना सांगितलं थांबा मी येतोय. याचं कारण मला नागरिकांच्या जीवाशी खेळायचं नाही. राजकारण करायचं नाही. त्यांच्याही काही सूचना असतील तर त्याचंही आम्ही स्वागत करु. आमच्यात तेथे बोलणं झालं ते खुलेआम झालं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.