नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे रोज नवनवीन मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसतात. हाच मुद्दा काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चेचा विषय बनला. त्यावरून राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका न करता पक्षाच्या धोरणावंर टीका केला पाहिजे असे मत मांडले. राहुल गांधी यांना हे न पटल्याने त्यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका का करतो हे स्पष्ट केलं. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
राहुल गांधी यांनी आपण नरेंद्र मोदींना आपण घाबरत नसून यापुढेही त्यांच्यावर टीका करणार असल्याचं स्पष्ट केले. तसेच पक्षातील काही नेते मात्र त्यांच्यावर टीका करण्यापासू दूर राहतात असे सांगत राहुल गांधी यांनी यावर नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत लडाखपासून ते देशावरील आर्थिक संकटांपर्यंत सर्व गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घेण्यात आलेले निर्णय जबाबदार असताना त्यांना जाब विचारल्याशिवाय चर्चाच होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांचे समर्थन करत मोदींविरोधात ते एकटेच लढत असल्याचे दिसत आहे असे म्हटले.
काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत सहभागी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि झारखंडचे प्रभारी आरपीएन सिंग यांनी बैठकीत बोलताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने अनेक मुद्दे भरकटले जातात. यामुळे आपण नरेंद्र मोदींवर थेट टीका न करता त्यांच्या धोरणांवर टीका केली पाहिजे असे मत मांडले. पक्षातील इतर नेत्यांनीही अनेकदा मत मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्याने भाजपा आणि मोदींना सहानुभूती मिळते आणि त्याचा ते फायदा उचलतात असे म्हटले आहे. तसेच याचा तोटा काँग्रेसला होत असल्याचेही त्यांचे मत आहे. २०१९ च्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पक्षाचा प्रचार मोदींवर जास्त केंद्रीत राहिला आणि इतर मुद्द्यांना पक्षाने मांडलेच नाही ही चर्चा चांगलीच रंगली होती.
राहुल गांधी यांची बोलण्याची वेळ येताच त्यांनी आपण आरपीएन सिंग यांनी मांडलेल्या मुद्द्यावर बोलण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी म्हटले की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली पाहिजे की त्यांच्या धोरणावंर यासंबंधी कार्यकारिणी जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. कारण मी पक्षाचा सेवक आहे. पण मला सांगायचं आहे की, हे सर्व नरेंद्र मोदींचं अपयश आहे. मग तो लडाखचा मुद्दा असो अथवा आर्थिक संकटाचा. राहुल गांधी यांना यावेळी उलट प्रश्न करत आपण कोणावर टीका केली पाहिजे तुम्हीच सांगा अशी विचारणा केली असल्याचेही वर्तमानपत्रात सांगण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांनीही यावेळी राहुल गांधी यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगत राहुल गांधी आणि काही नेते वगळता इतर सर्व नेते नरेंद्र मोदींवर टीका करत नसल्याचे म्हटले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या मताशी सहमत असल्याचे सांगत नरेंद्र मोदींवरच टीका केली पाहिजे यावर एकमत केले.