मुंबई – आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. शासकीय महापुजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होते.
दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना ‘आषाढी एकादशी’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊ दे! बळीराजा सुखी होऊ दे! शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे! बा पांडुरंगा, जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव”.
महाराष्ट्राची संतपरंपरा, पांडुरंग भक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकरी माऊलींना वंदन करतो. समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करुन, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं, सर्वांना समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंग भक्तीची, पंढरपूर वारीची परंपरा आपलं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे.
हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. पांडुरंगाच्या कृपेनं कोरोनाचं संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीनं पंढरपूरला जाऊ शकू, असा मला विश्वास आहे. या आशयाची पोस्ट अजित पवार यांनी केली आहे.