बीड : भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडमधील गोपीनाथ गडावर आल्या असताना आजच्या दिवशी राजकीय चर्चा न करता चांगली सुरुवात करण्याची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच आपल्यावरील राजकीय आरोपांवर उत्तर देताना माझा जिल्हा जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा मी जिल्ह्यात नेहमीच असते. ते सिद्ध करण्याचा हा दिवस नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
गोपीनाथ गडावर दर्शनानंतर त्या दसऱ्याच्या निमित्ताने आज भगवानगडाकडे रवाना झाल्या. प्रीतम मुंडे म्हणाल्या, “बाबांचा आशिर्वाद घेऊन भगवान बाबांचे आशिर्वाद घेण्यासाठी गोपीनाथ गड ते सावरगाव घाट हा प्रवास मी दरवर्षीप्रमाणे करणार आहे. मागच्या वर्षी करोनाच्या कारणामुळे हा प्रवास होऊ शकला नाही.
छोट्याशा ब्रेकनंतर ती सुरुवात पुन्हा करतोय. लोकांच्या मनात उत्साह आहे. या दिवशी आपली ऊर्जा घ्यायची पुढचं वर्षभराचा आपला प्रवास करायचा या भावनेने लोक आमच्यासोबत जोडले जातील. सावरगावमध्ये देखील भगवान बाबांच्या दर्शनासाठी येतील.”
“स्वागतासाठी कोणतीही मोठी तयारी करू नका अशी कार्यकर्त्यांना वारंवार विनंती केली आहे. त्यांच्या मनातील उत्साह साहजिक आहे. भेटायला येतील, थांबतील, माझं स्वागत करतील. पण कुठलाही बडेजाव न करण्याची विनंती आम्ही नेहमीच करतो. तसे आमचे कार्यकर्ते समजूतदार आहेत. कुठल्याही दिखाव्याकडे त्यांचा कधीच कल नसतो,” असे प्रीतम मुंडे यांनी नमूद केले.
राजकीय आरोपांवर प्रश्न विचारला असता प्रीतम मुंडे म्हणाल्या, “मी जिल्ह्यात नेहमीच असते. ते सिद्ध करण्याचा हा दिवस नाही. माझा जिल्हा अडचणीत आहे आणि मी दुसरीकडे आहे असा एकही दिवस नव्हता. मी केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी पक्षाची खासदार म्हणूनही जिल्ह्यात होते आणि आज राज्यात विरोधी पक्षाची लोकप्रतिनिधी म्हणून देखील आम्ही आहोत.”
“आमचा दिवस राजकीय गोष्टींचा नाही. २ वर्षानंतर जीवन पुन्हा रुळावर येतंय. त्याविषयी लोकांमध्ये उत्सूकता आहे. असे असल्याने राजकीय चर्चा न करता आजच्या दिवशी चांगली सुरुवात करावी अशी इच्छा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.