कोल्हापूर – राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव बाजूला गेल्याच्या चर्चेनंतर स्वतः राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधान परिषद हे साधन नाही.
आमदारकी नाही मिळाली म्हणून आमच्याकडे 10-20 लोक आत्महत्या करतील, असे काही नाही. प्रत्येकाच्या वेळा येत असतात. त्या वेळेस आपण ठरवू काय करायचे ते. मात्र त्यावेळेस एकेकाचे हिशोब चुकते करू. त्यासाठी मी समर्थ आहे, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. ते कोल्हापूरच्या चिंचवाड गावात पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी समझोता झाला होता. त्यानुसार एक विधान परिषदेत जागा स्वाभिमानाला मिळणार एवढेच ठरले होते. मग त्यासाठी एवढी चर्चा कशासाठी आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आमच्यावर मेहेरबानी आणि दया कोणी करत नाही. आम्ही राजकारण करतो, ते चळवळ मजबूत करण्यासाठी. राजकारण हे आमचे साधन आहे.
साध्य नाही आणि भविष्यातही असणार नाही. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडत नाही. आमची वेळ आल्यास एकेकाचे हिशेब चुकते करू. त्यासाठी मी समर्थ आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी इशारा दिला.