ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या भावना
पुणे – पु. ल. देशपांडे यांचा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नसला तरी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमच त्यांच्या सहवासात असतो. मी पुलंचा एकलव्य आहे, कारण माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत पुलंच्या साहित्याचा सिंहाचा वाटा आहे. पुलंच्या जन्मशताब्दी सांगता समारंभात त्यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार आज मला मिळाला, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.
पु. ल. यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित “ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी सराफ यांना “पुलोत्सव जीवनगौरव’ आणि ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना “विशेष सन्मान’ प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 25 हजार रुपये असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.
“या पुरस्काराने माझी उमेद वाढवली. पुलंच्या साहित्याने जी सकारात्मकता पेरली, ती बीजे माझ्याही मनात रोवली गेल्याने मी आजाराशी दोन हात करू शकलो. माझे मानपत्र वाचत असताना मी साकारलेल्या भूमिकांचा उल्लेख असलेल्या वाक्याला जेवढ्या टाळ्या झाल्या नाहीत, त्या पेक्षा मी व्याख्यानांच्या माध्यमातून सावरकरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करीत असल्याच्या वाक्याला जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो माझी उमेद प्रचंड वाढवणारा आणि स्फूर्ती देणारा आहे,’ असे पोंक्षे म्हणाले.
“दलित साहित्याविषयी पुलंना प्रचंड आस्था होती. दाहक वास्तव वाचून पुलं तळमळून उठायचे. दया पवार यांच्या बलुतं पुस्तकाचे रसग्रहण करणारा “गदगदलेलं झाड’ हा लेख पुलंनी एका दैनिकात लिहिला आणि तो प्रचंड गाजला. त्यामुळे त्या एका दिवसांत “बलुतं’च्या 700 प्रतींची विक्री झाल्याचे खुद्द दया पवारांनी नमूद केलेले आहे,’ असे जाधव म्हणाले.
यावेळी अशोक सराफ यांच्याशी सुधीर गाडगीळ यांनी विशेष संवाद साधला. शरद पोंक्षे यांनी पु.ल. यांच्या साहित्यातील काही उताऱ्यांचे अभिवाचन केले.