मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेकांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेमधून त्यांनी चौफेर टोलेबाजी करत, मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर निशाणा साधणाऱ्यांना राज ठाकरेंनी चांगलेच फैलावर घेतले.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेनंतर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील या भाषणावर आपली भावना व्यक्त केली आहे. सध्या रोहित पवार हे नाशिक दौऱ्यावर असून, यावेळी समाज सांध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं.
यावेळी रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे यांच्या भाषणाचा मी चाहता आहे. त्यांचे भाषण मला भावते तसे सर्वसामान्य जनतेला देखील भावते. पण, नुकतेच त्यांचे जे भाषण झाले त्या भाषणात मध्ये-मध्ये भाजपचा प्रभाव दिसून येत होता, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.
तसेच ते पुढे म्हणाले, त्यांची मूळ शैली आहेत ती मात्र थोडी-थोडी दिसून येत होती, त्यामुळे त्यांनी पुढील काळात त्यांची मूळ शैलीच जोपासावी, लोकांच्या हिताचे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात मांडावे, कुठलाही भेदभाव न करता राज ठाकरे यांनी आपले भाषण करावे, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.