मुंबई: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मुंबईतर्फे युवा संवादाचा कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान, माझं वय ८० वर्षांचं झालंय पण तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर्षांपर्यंत गेली नसल्याचे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, मुंबई विद्यापठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. यातून मला जाणून घ्यायचं आहे की तुमची पिढी आणि माझ्या पिढीत किती अंतर वाढलंय? माझं वय ८० वर्षांचं झालंय पण तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर्षांपर्यंत गेली नाही.
५२ वर्षांपूर्वी मी महाराष्ट्र विधानसभेत वयाच्या २६ व्या वर्षी पहिल्यांदा निवडून आलो. हे सांगायचं कारण केवळ हेच आहे की २६ व्या वर्षी देखील आपण विधानसभेत निवडून येऊ शकतो हा पर्याय तुम्हाला कळायला हवा. या पन्नास वर्षांच्या काळात अनेक गोष्टी होऊन गेल्या. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली. या काळात नव्या पिढीशी संवाद साधण्याची संधी मिळाली की अधिक उत्साहाने काम करण्याची भावना तयार व्हायची.