नवी दिल्ली : तेलंगणातील हैदराबादमध्ये ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या केल्याच्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शासन करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. यातच तेलंगणा सरकारमधील मंत्र्यानेही नराधमाला पकडून त्याचा थेट एन्काऊंटर करुन टाकू असे धक्कादायक विधान केले आहे.
तेलंगणा सरकारचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदरबाद बलात्कार प्रकरणावर संताप व्यक्त केला. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. इतकंच नव्हे, तर या प्रकरणातील नराधमाला अटक करुन त्याचा एन्काऊंटर करुन टाकू, असेही धक्कादायक वक्तव्य रेड्डी यांनी केले आहे. लवकरच पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुटुंबीयांना आवश्यक अशी सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे सांगतानाच आरोपीला सोडणार नाही. त्याचा एन्काऊंटर करुन टाकू असे रोखठोक मत रेड्डी यांनी व्यक्त केले आहे.
हैदराबादमधील या धक्कादायक प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहेत. नागरिकांमध्ये रोष वाढत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच खासदार रेवाथ रेड्डी यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. हैदराबादसह संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी या प्रकरणावरुन निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी मेणबत्त्या घेऊन मोर्चे देखील काढले गेले आहेत. चिमुकल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी नागरिकांना लावून धरली आहे.
एका ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण ९ सप्टेंबर रोजी घडले होते. मुलीचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. पोलीस या प्रकरणात एका ३० वर्षीय व्यक्तीचा शोध घेत आहेत. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून एकूण १५ पथकं नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात देखील आरोपीचा शोध घेतला जात आहे. हैदराबाद पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे. या प्रकरणामुळे तेलंगणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे पोलिसांवर आरोपीचा शोध घेण्यासाठी दबाव वाढताना दिसत आहे.