देशभरात संतापाची लाट
जनावरांच्या महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या
हत्येनंतर मृतदेह तीस किमीवर नेऊन जाळला
तपास रेंगाळला फुटेज तपासातच
हैदराबाद : स्कूटी बंद पडल्यानंतर हैदराबाद येथील जनावरांच्या महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती हैदराबादमध्ये घडल्याने देशभर संपाप व्यक्त होत आहे. मात्र या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे एका अश्राप जीवाला जीवघेणे अत्याचार सहन करत प्राण गमवावे लागले. यात पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत झाल्याचा आरोप या मुलीच्या वडिलांनी केला आहे. तर पोलिसांनी या नीच कृत्याच्या सुत्रधारासह चार आरोपींना अटक केली आहे.
हा प्रकार (बुधवारी दि. 27) घडला. निर्भया आपल्या स्कूटीवरून येत असताना हैदराबाद बंगळुरू महामार्गावर त्यांच्या स्कूटीचे टायर पंक्चर झाले. त्यावेळी तेथे असणाऱ्या ट्रकचालकांनी ती स्कूटी मेकॅनिककडे नेण्यास मदत केली. त्यानंतर तिने आपल्या बहिणीला फोन करून याची कल्पना दिली. त्यानंतर काही जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तिचा खून करून मृतदेह 30 किमी अंतरावर नेऊन जाळून टाकला.
याबाबत तिच्या वडिलांनी पोलिसांवर हलगर्जीपणा आणि वेळकाढूपणा केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ते पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोहोचले. मात्र पोलिसांनी त्या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात वेळ घालवला. एवढेच नव्हे तर पोलिसांनी मला निर्भया काम करत असलेल्या दवाखान्यात पोहोचली होती का? हे पाहण्यास पाठवले. त्यानंतर थोड्या वेळाने ही घटना दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने दुसऱ्या पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.
दुसऱ्या पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तेथे आधीच्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी पोलिस ठाण्यातील तपासाबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर शेवटी 11च्या सुमारास पोलिस फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष शोध घेण्याऐवजी त्याभागातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात वेळ घालवण्यात आला. मी पोलिसांना विनंती केली माझ्या मुलीला शोधण्यासाठी माझ्याबरोबर या म्हणून विनंती केली. त्यावेळी पोलिस माझ्यासोबत तीन वाजण्याच्या सुमारास आले.
पोलिसांना तपासात काय प्रगती झाली का? असे विचारता ते केवळ स्कूटी ताब्यात मिळाल्याचे सांगत असत, असे ते म्हणाले.
दरम्यान, तेलंगणाचे पोलिस महासंचालकांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधारांसह चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, असे सांगितले.
पोलिसांना हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर दि. 27 नोव्हेंबरला सकाळी आठच्या सुमारास जळलेल्या महिलेचा मृतदेह सापडला. रात्री सडे नऊच्या सुमार ती हरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री 9 वाजून 22 मिनिटांनी तिने केलेल्या मोबाईलवर केलेले संभाषण निर्भयाच्या कुटुंबीयांनी जारी केले आहे. त्यात ती तिच्या बहिणीला सांगते, माझ्या स्कूटीचे टायर पंकचर झाले आहे. काही ट्रकचालकांनी ती मेकॅनिककडे नेली आहे. पण मला भीती वाटत आहे, असे ती त्यात म्हणते. या साऱ्या घटनाक्रमांवरून पोलिसांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान तेलंगंणाचे गृहमत्री मोहंमद महंद अली यांनी सांगितले की, तिने बहिणीला फोन करण्याऐवजी 100 क्रमांकाला केला असता तर तिला वेळेत मदत मिळू शकली असती. ती शिकलेली होती तरी तिला हे सुचले नाही हे दुर्देव. या पुढे कोणत्या भगिनीवर आपत्ती आलीच तर तिने या क्रमांकावर आधी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.