नगर – हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केला. पोलिसांच्या या कृत्यांचे अनेक जण समर्थन करत आहेत. तर काही जण विरोधही करत आहेत. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर पोलिसांनी केलेला एन्काउंटर योग्य आहे, असे मत मांडले आहे.
अण्णा हजारे म्हणाले कि, देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले जलदगती न्यायालयात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, हैद्राबाद घटनेतील अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळावर आणले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेऴी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली. या कारवाईविरोधात शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. चारही आरोपींची चकमकीमध्ये हत्या करण्याच्या घटनेची चौकशी करण्यास राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुरुवात केली आहे. तर चारही आरोपींचे मृतदेह जतन करून ठेवण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारीच राज्य सरकरला दिले आहेत. या चारही आरोपींच्या शवविच्छेदनाचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.