विभागीय आयुक्तांचे आदेश : सातगाव पठारात स्वतः गेले शेताच्या बांधावर
पेठ – सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात परतीच्या पावसाने शेत पिकांचे झालेले नुकसान पाहणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पेठ येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. सर्व अधिकारी यांना त्वरित शेत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
अतिवृष्टीने बाधित असलेल्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागाचा पाहणी दौरा बुधवारी (दि. 6) दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी केला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तहसीलदार रमा जोशी, गट विकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, कृषी सहायक व्ही. एच. मिडघुले उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांनी पेठ येथील सुरेश धोंडिबा धुमाळ आणि जयंत काशिनाथ थिटे, नामदेव रासकर यांच्या शेतातील बटाटा, कांदा, मका या पिकांची पाहणी केली. यावेळी पावसाचे पाणी शेती परिसरात साचल्याने मका, बाजरी, कांदा, लसूण, कोथिंबीर, पालेभाज्या, आंबा, कारले, ज्वारी, हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची पाहणी केली. शेतकरी वर्ग पावसाने हैराण झाला व दुखावलेला आहे.
शेतात काबाडकष्ट करून कधी शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, तर कधी अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे मोठा भांडवली खर्च व मेहनत करूनही कष्टकरी शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागत नाही. त्यातच आता निसर्गाच्या लहरीपणामुळे सततच्या कोसळणाऱ्या धारांनी बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. यावेळी कृषिसहायक पी. बी. ढेंगळे, तलाठी हेमंत भागवत, कोतवाल संदीप तोत्रे यांनी नुकसानीच्या पाहणीचे नियोजन अधिकाऱ्यांसोबत केले.
शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अडचणीत
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र हीच शेती आता अडचणी येऊ लागल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळणार हे नक्की आहे. त्यामुळे मायबाप सरकारने वेळीच यावर उपाययोजना करण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी यांच्यासमोर केली.