चेन्नई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले “निवार’ चक्रीवादळ रात्री अडीचच्या सुमारास पुदुच्चेरीच्या समुद्र किनाऱ्यावर धडकले. समुद्रकिनारी धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. सध्या 120 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. “निवार’ चक्रीवादळ गेल्या सहा तासांत 16 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. भारतीय हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. “आयएमडी’च्या अहवालानुसार, कुडलोरच्या (तामिळनाडू) पूर्वे-दक्षिणपूर्व आणि पुदुच्चेरीला धोका असल्याचे म्हटले आहे.
‘निवार’ चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये कोणतीही जीवितहानी झल्याचे वृत्त नाही. मात्र तामिळनाडूमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वादळामुळे सुमारे एक हजार झाडे उन्मळून पडली आहेत. तर मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. पुद्दुचेरीमध्ये सर्वाधिक 30 सेंटीमीटर पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ तमीळनाडूतील कुड्डालोर, नागापट्टीनाम, कराइकल् आणि चेन्नईमध्येही मुसळधार पाऊस झाला.
पुद्दुचेरी आणि तमीळनाडूमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
बहुतेक किनारी प्रदेशात खंडित झालेला वीजपुरवठा पुर्ववत सुरू केला जात असून साचलेले पाणीही उपसले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जीवित हानी नसली तरी पावसाशी संबंधित किरकोळ दुर्घटना घडल्या असल्यचे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूमध्ये पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे आणि हे वादळ आता भूभागाच्या आतील भागात सरकले आहे,ते आता आणखी कमकुवत होईल, असे चेन्नईचे हवामानशास्त्र उपसंचालक एस. बालाचंद्रन यांनी सांगितले.