खड्याचीवाडी येथील घटना; भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
ढेबेवाडी – खड्याचीवाडी (तारुख), ता. कराड येथील शेतकरी रतन पांडूरंग चव्हाण यांच्या माळ नावाच्या शिवारात दावणीला बांधलेली मुऱ्हा जातीची रेडी भूकेने व्याकूळ बिबट्याने दिवसाढवळ्या फस्त केल्याची घटना घडली. बिबट्याने जवळच्या शेतात नेऊन रेडीला फस्त केल्याने शेतकऱ्यांमधून भितीचे वातावरण निमार्ण झाले आहे. वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्याकडून होत आहे.
तारुख विभागात बिबट्याचा वावर वाढला असून या एक वर्षाच्या कालावधीत तारुख तसेच वाड्यावस्त्यामधील भागात एका वर्षात आतापर्यंत दोन बिबटे मृत अवस्थेत आढळून आले आहेत.परंतु या भागामध्ये मृत अवस्थेत आढळलेले बिबटे हे भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत आल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. या बिबट्यांकडून पाळीव प्राण्यावर हल्ले होण्याचे अनेक प्रकार घडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
खड्याचीवाडी येथील शिवारात रतन पांडूरंग चव्हाण यांची शेती असून त्यांनी शेतामध्ये मुऱ्हा जातीचे साधारण दोन वर्षाची रेडी चरण्यासाठी बांधली होती.चव्हाण हे रानातील कामात मग्न झाले.
काही वेळानंतर ते पुन्हा रेडी बांधलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना रेडी आढळून आली नाही. त्यांनी शोधाशोध केली असता पिकामध्ये बिबट्याने रेडी फस्त केल्याचे आढळून आले.
भूकेने व्याकुळ झालेले बिबटे लोकवस्तीत येऊ लागल्याने तारुख येथील वाड्यावस्तीमध्ये लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राणी, कुत्री, शेळ्या, गायी अशा अनेक प्राण्यांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.