सुरेश डूबल
शेतकरीही अडचणीत
सातारा, सांगली, कोल्हापुरातील बहुतांश शेतकरी हे ऊसाचे पीक घेतात. यंदा गरजेपेक्षा जास्त पाऊस पडला, महापूर आला. परतीच्या पावसानेही उसंत घेतली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले ऊसाचे पीक पुराच्या पाण्यात गडप झाले. परतीच्या पावसानेही नुकसान केल्याने राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घासदेखील या पावसाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकरीही अडचणीत आलेला आहे.
कराड – पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे ऊसपट्ट्याचे म्हणून ओळखले जातात. या तिनही जिल्ह्यात मोठमोठे कारखाने आहेत. कोट्यवधी रूपयांची उलाढाल यातून होत असते. मात्र यंदा पावसाने घातलेला धुमाकुळामुळे याचा थेट परिणाम ऊस पिकावर झाला आहे. या ऊस पट्टयात अपेक्षेपेक्षा ऊसक्षेत्र कमी झाले असून कारखानेही प्रतिवर्षापेक्षा कमी कालावधीतच आपला बोऱ्या बिस्तरा गुंडाळणार आहेत. या सर्वांचा थेट परिणाम ऊसतोड कामगारांवर होणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम महाराष्ट्राला निसर्गाच्या कृपेने मुबलक पाणी मिळाले. त्यामुळे विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर येथील शेती चांगली पिकत आहे. ऊसाला जास्त पाणी लागते, आणि त्या पाण्याची कसलीही कमतरता इकडे नसल्याने सर्वात जास्त ऊसाचे पीक घेतले जाते. या ऊसावर प्रक्रिया करून साखर बनवण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर कारखाने उभे राहिले आहेत. प्रतिवर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल या साखरेच्या माध्यमातून होते. याचा फायदा शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांनाही मिळत असतो.
यंदा मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरवर निसर्ग चांगलाच कोपला. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे या ऊस पट्ट्यातील इतर पिकांसह मुख्यतः ऊसाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दहा-पंधरा दिवस ऊसाचे पीक पाण्याखाली राहिल्याने ते कुजून गेले आहे. तर काही ठिकाणी जादा पावसामुळे ऊसाची वाढही खुंटली आहे.त्यामुळेच प्रतिवर्षीपेक्षा तब्बल 60 टक्यांच्यावर यंदा ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याने कारखानदार धास्तावले आहेत.
बरेच कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. मात्र अवकाळी पावसाने अधूनमधून धुमाकूळ सुरूच ठेवल्याने आत्ताच कारखाने कसे चालू करायचे? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत कारखाना जास्तीतजास्त दिवस चालावा यासाठी ऊसाची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
संबंधित कारखान्यांनी याआधीच आपल्या कामगारांना उचलीही दिल्या आहेत. मात्र त्या कामगारांना दिलेल्या उचली फिटण्यासाठी कारखाना तर जास्त दिवस चालू राहिला पाहिजे. यावर्षीची परिस्थिती पाहता कारखाने मागील वर्षापेक्षा तब्बल दोन महिने उशिरा चालू होणार असून, मागील कालावधीपेक्षा निम्म्या कालावधीत यंदा कारखाने ऊसाच्या कमतरतेमुळे बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या ऊसतोड कामगारांना पैसे कमवायचे तर लांबच, कारखाने चालले नाहीत तर त्यांनी दिलेल्या उचल्याउचली कशा फेडायच्या, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या बिकट परिस्थितीमुळे ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ येण्यासारखी स्थिती निर्माण झाले आहे.