पळसदेव – सध्या संपूर्ण देशात करोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे पर्यायाने मच्छी मार्केट देखील बंद आहे. त्यामुळे मच्छी मार्केट बंद असल्याने उजनी धरणात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने उजनीत मासेमारी करून उपजीविका करणाऱ्या मच्छिमारांवर सध्या मोठे संकट कोसळले आहे.
उजनी धरणाच्या काठावर पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील नदीकाठावरील गावात अनेक परप्रांतीय मच्छिमार मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत आहेत. त्याच्या सोबत या भागातील अनेक स्थानिक मच्छीमार देखील या उजनीत मासेमारी करून आपली गुजराण करत आहेत. मात्र मार्केट बंद झाल्याने मासे पकडता येत नाहीत, मग जगायचं कसं असा मोठा प्रश्न सध्या या मच्छीमारांना पडला आहे. अनेक मच्छीमार परराज्यातून अथवा इतर जिल्ह्यातून आलेले असल्याने त्यांना या ठिकाणी रेशन देखील उपलब्ध होत नाही.
शिवाय लॉकडाऊन असल्याने गावाकडेही जात येत नाही, मग नेमकं जगायचं कसं हा मोठा प्रश्न या मच्छीमारांना पडला आहे. अगदी इंदापूर तालुक्यात पळसदेव, काळेवाडी, डाळज, भिगवण, चांडगाव, गंगावळण, पडस्थळ आदी गावात मोठ्या प्रमाणात मांगूर माशाची पैदास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परराज्यातून मच्छीमार आलेले आहेत. त्यांचा सध्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मार्केट बंद असल्याने सर्वत्र मासेमारी व्यवसाय ठप्प पडला आहे, त्यामुळे आम्ही मासेमारी सोडून शेती करत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे कोणतीही बाजारपेठ चालू नाही. त्यामुळे सर्व कष्टकरी नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा बाजार पूर्वपदावर येण्यास आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
– दिलीप नगरे, स्थानिक मच्छीमार