बीड: लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित कामगार आणि मजूरांना बसत आहे. या काळात रोजगार नसल्याने अनेक मजुर घराच्या ओढीने पायीच निघाले आहेत. यात पुण्याहून परभणीकडे पायी निघालेल्या मजुरांचा भूक आणि डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवला आहे.
पिंटू पवार असे या ऊसतोड मजुराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धानोरा येथे सोमवारी पिंटू पवार हा मृतावस्थेत आढळला. या तरुणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यातून धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे 15 मे रोजी जास्त प्रमाणात चालल्याने भूकेने आणि डिहायड्रेशनने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती अंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कुकलरे यांनी दिली.
हा तरुण परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील धोपटे पोंडूल गावचा रहिवासी होता. पुणे जिल्ह्यात ऊसतोड मजुर म्हणून तो काम करीत होता. दरम्यान, लॉकडाउनची घोषणा झाल्याने खाण्यापिण्याचे हाल व्हायला लागल्यानंतर तो पुण्यात आपल्या भावाच्या घरी राहण्यासाठी गेला. दरम्यान, लॉकडाउन लवकर मिटण्याची चिन्हे दिसत नसलयाने त्याने पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुण्याहून 8 मे रोजी त्याने आपला प्रवास सुरु केला. दरम्यान, 14 मे रोजी तो अहमदनगर येथे पोहोचला. त्यादिवशी मोबाईल फोन नसल्याने त्याने दुसऱ्या एका व्यक्तीच्या फोनवरुन आपल्या गावी फोन केला आणि कुटुंबियांशी बोलणे झाले.
त्यानंतर तो पुढे बीड जिल्ह्यातील धानोरापर्यंत 30 ते 35 किमी चालत गेला आणि एका छोट्या शेडखाली विश्रांतीसाठी थांबला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या शेडजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीला कुजका वास आल्याने त्याने पोलिसांना याची खबर दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शेडमध्ये जाऊन पाहिले तर त्यांना पवार हा मृतावस्थेत आढळला.